स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Wednesday, September 30, 2020

-- भारताचा इतिहास,भाग.2.आधुनिक भारत --

-- भारताचा इतिहास,भाग.2.आधुनिक भारत --  



            ११ व्या शतकात इराणमधील अरब सेनापती मोहम्मद बिन कासीमने सिंध प्रांतात आक्रमण केले व तेथील दाहीर राजाचा पराभव करुन तो प्रांत काबीज केला.यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर इस्लामी राजवट लागू झाली.भारतातील अनेक राज्ये आर्थिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणांत सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत.गझनी येथील एका महमूद नावाच्या राज्यकर्त्याने भारतात लुटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या.मंगोल सम्राट तैमूरलंगने केलेले दिल्लीतील शिरकाण मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे इतिहासकार नमूद करतात.अफगाण शासक महंमद घोरीने भारतावर आक्रमण केले.अजयमेरुचा (आजचे अजमेर) एक राजपूत राजा पृथ्वीराज चौहानशी त्याचा संघर्ष झाला.आठ युध्दानंतर पृथ्वीराज चौहानचा मृत्यू झाला.महंमद घोरीने कुतूबुद्दीन ऐबक या आपल्या गुलामास भारतातील जिंकलेल्या मुलूखाचा सुभेदार म्हणून नेमले.महंमद घोरी नंतर अफगाणिस्तानात परत निघून गेला.महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतूबुद्दीनने त्याचे स्वातंत्र्य घोषित केले.त्याच्या वारसदारांनी पुढील काही वर्षे भारतावर राज्य केले.नंतर त्याचा सेनापती जलालुद्दीन खिलजीने त्याच्या विरुध्द उठाव करून सत्ता हस्तगत केली.१३व्या शतकात त्याचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजीने त्याची कपटाने हत्या केली आणि तो शासक बनला.   त्याने अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत शासन केले.

                       यात राजस्थानमधील चित्तोडचा राजपूत राजा रतनसिंग व राणी पद्मावतीचा इतिहास न विसरण्यासारखा आहे.दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राजवटी उदयास आल्या.महाराष्ट्रात हसन गंगू बहामनी याने बहामनी साम्राज्याची स्थापना केली.उत्तर कर्नाटकाचा काही भागदेखील या साम्राज्यात समाविष्ट होता.बहामनी साम्राज्यात आणि विजयनगर साम्राज्यात संघर्ष होता.पुढे बहामनी साम्राज्याची पाच शकले झाली.

                अहमदनगरची निजामशाही,विजापूरची 
आदिलशाही,गोवळकोंड्याची कुतूबशाही,एलिचपूरची (आजचे अचलपूर) इमादशाही,बिदरची बरीदशाही अशी ती पाच राज्ये निर्माण झाली होती.त्यांच्यातही साम्राज्यविस्तारासाठी संघर्ष होत असत.या पाचपैकी चार राज्यांनी विजयनगरवर हल्ला करून त्याचा अंत केला.आपापसांतील सत्तासंघर्षात त्यांच्यापैकी एलिचपूर आणि बिदर ही राज्ये कालौघात नष्ट झाली.मुघल बादशाहा शाहजहानने अहमदनगरची निजामशाही जिंकून घेतली.मुघल आणि दक्षिण भारतातील इस्लामी राज्ये यांच्यात साम्राज्य-विस्तारासाठी संघर्ष होत.मुघल राजवटीत काही राजपूत राज्यांनी मुघलासमोर आव्हान उभे केले. पंजाबात महाराज रणजितसिंगच्या नेतृत्वाखाली शीख साम्राज्याची स्थापना झाली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा स्वराज्याची महाराष्ट्रात स्थापना झाली.ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुन‍:प्रस्थापन करणे हा होता. शहाजहानचा पुत्र मुघल सम्राट आलमगीर औरंगजेबाच्या म्रुत्युनंतर मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली व दक्षिण भारतातील विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतूबशाही तर इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या तीन परकीय सत्तांचा प्रतिकार केला.त्यापैकी कुतूबशाही आणि फ्रेंचांशी त्यांनी मैत्री करार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबच्या नेतृत्वाखाली मुघलानी मराठा राज्यावर आक्रमण केले केला.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलाबरोबर संघर्ष केला.

          औरंगजेबाने कपटाने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून त्यांना ठार मारले.छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रुत्युनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी नेतृत्व केले.मुघल सेनापती दिलेरखानाने मराठ्यांची राजधानी असलेला रायगडाला वेढा घालून जिंकल्यामुळे राजारामाना रायगड सोडून जिंजीला पलायन करावे लागले.प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजारामाचा मृत्यू झाला.औरंगजेबाने संभाजीची पत्नी येसूबाई व मुलगा शाहू यांना कैद केले.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मुघलांनी शाहूची व येसूबाईची मुक्तता केली.शाहू व राजारामाची पत्नी ताराबाई यांच्या युध्दात शाहूने ताराबाईचा पराभव केला.मराठा राज्याची वाटणी झाली.त्यानंतर पेशव्यांनी हळूहळू मराठा साम्राज्याचा विस्तार सुरु केला.मराठेशाहीनंतर पेशवे आले आणि त्यांनी आपली मुख्य राजधानी पुण्यात वसवली. महाराष्ट्रात पेशवाईची स्थापना झाली.पेशवे मराठेशाहीचे सत्ताधीश बनले.पहिले बाजीराव पेशवे एक कर्तबगार राजकारणी होते.त्याचे स्वप्न हिमालयापर्यंत राज्य करण्याचे होते.पहिल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र असलेल्या नानासाहेबांच्या काळात अफगाण शासक अहमदशहा अब्दालीशी झालेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात दारूण पराभवानंतर पेशव्यांचे पतन सुरू झाले.त्याचा सर्वाधिक फायदा युरोपियन साम्राज्यवाद्यांना झाला.सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून वसाहती स्थापल्या होत्या व ते आपले साम्राज्यवादी धोरण पुढे रेटत होते.           

               इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच,डच हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच मुत्सद्देगिरी,फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली.बंगालपासून सुरुवात करत कर्नाटकातील म्हैसूरचा सुल्तान हैदर अली व त्याचा मुलगा टिपू सुलतान,१८१८ मध्ये मराठा साम्राज्य,१८५० च्या सुमारास पंजाबमधील शीख साम्राज्य व जाट साम्राज्ये असे एक एक हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली गुलाम बनवले.ईस्ट इंडिया कंपनी सरकारने पर्यायाने इंग्रजांनी भारताचे आर्थिक शोषण केले.फ्रेंचानी डिचेरी व चंद्रनगर व पोर्तुगीजांनी पाँडिचेरी, गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली हस्तगत केले.भारतातील त्यांची मांडलिक संस्थाने दत्तक वारस नामंजूर करुन खालसा केली.१८५७ मध्ये ब्रिटिश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पाहता पाहता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटिशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्याची ऊर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीकडून कारभार इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारकडे गेला.


                इ.स. १९३७ साली महात्मा गांधी सोबत पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर स्वातंत्र्य चळवळ सुरू केली.१९२० मध्ये टिळकांच्या मृत्युनंतर गांधींनी चळवळीची सुत्रे हाती घेत अंहिसेच्या व असहकाराच्या मार्गाने अनेक चळवळी केल्या.तसेच काही सशस्त्र क्रांतीकारी संघटनाही उभ्या राहिल्या.सरतेशेवटी दुसऱ्या महायुद्धानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लीम असलेला भाग आजचा पाकिस्तान व बांगलादेश हे वेगळे व्हावे लागले.फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे.आधुनिक भारताचे निर्माते व अद्वितीय बहुआयामी विद्वान असलेल्या कायदेपंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या तब्येतीची पर्वा न करता अत्यंत मेहनतीने ३ वर्षामध्येच जगातील सर्वात महान व मोठे असे भारताचे संविधान लिहिले.घटनाकार बाबासाहेबांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘भारतीय राज्यघटना’ संविधान समितीला सुपूर्द केली.आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली,भारत गणतंत्र राष्ट्र बनले व जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र अशी आज बिरुदावली मिरवत आहे.भारत संघराज्य बनले.

               भारतात १९५६ नंतर भाषावार प्रांतरचना झाली.
फ्रान्सने आपल्या ताब्यातील भारतीय वसाहती वसाहती-मध्ये सार्वमत घेऊन भारताकडे सोपवल्या.पोर्तुगीजांशी भारताला लढावे लागले.१९६१मध्ये भारताने आपले लष्कर पाठवून गोवा,दीव,दमण आणि दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त केले.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने सामान्य गतीने आर्थिक व सामाजिक सुधारणांचा स्वीकार करून वाटचाल केली.जम्मू आणि काश्मीर,पंजाबमध्ये १९८० च्या दशकात झालेला हिंसाचार व ईशान्येकडील आसाम,मणिपूर,मिझोराम,नागालैंड राज्यात सुरू असलेल्या हिंसाचार आणि गरिबीमुळे आदिवासी भागांत सुरू होत असलेला नक्षलवाद यांमुळे भारतातील आतंकवाद/दहशतवाद ही एक महत्त्वाचा सुरक्षाविषयक मुद्दा बनला आहे.१९९० पासुन भारतातील विविध शहरात आतंकवादी/दहशतवादी हल्ले झाले आहेत.भारताचे चीन व पाकिस्तान याच्याशी संलग्न सीमांबद्दल वाद आहेत त्यातून १९६२,१९४७, १९६५,१९७१ व १९९९ मध्ये युद्धे झाली.भारत अलिप्त राष्ट्रगट चळवळीचा तसेच संयुक्त राष्ट्रसंघाचा संस्थापक सदस्य आहे.इ.स.१९७४ आणि १९९८ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे भूमिगत अणुचाचण्या यशस्वीरीत्या पार पाडून स्वतःला एक आण्विक शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. १९९१ नंतर भारताने आर्थिक सुधारणांचा अंगीकार केल्यानंतर झपाट्याने आर्थिक प्रगती केली आहे.

👉स्त्रोत--> https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
📱मो.9503374833

Tuesday, September 29, 2020

-- भारताचा इतिहास,भाग.1.प्राचीन भारत --

 


   -- भारताचा इतिहास,भाग.1.प्राचीन भारत --      

              भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन
देशांमध्ये गणला जातो.येथील लिखित इतिहास 
२,५०० वर्षांपूर्वीचा असून इतर पुराव्यांनुसार भारतात ७०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी अस्तित्त्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये 
प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी सत्ताकेंद्री आल्या या राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केलं यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय. 
मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राज्य असेही म्हटले जाते.हे भारतातील पहिले प्रभावी असे केंद्रीय शासन होते. भारतामध्ये सत्ताही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली केंद्रीकृत अशी सत्ता होते.या काळामध्ये राज्यकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अंमलाखाली आणला आणि प्रजा कल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
                     मध्य प्रदेशातीलभिमबेटका येथील 
पाषाणयुगातील भित्तिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत.पुराणतज्ज्ञांनुसार आदि-
मानवाने भारतात सत्तर हजार वर्षांपूर्वी प्रवेश केला. साधारणपणे ९,००० वर्षांपूर्वी भारतात ग्रामीण 
व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृतीत 
रूपांतर झाले.इ.स.पू ३५०० चा सुमार सिंधू संस्कृतीचा काल मानला जातो.या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली.मोहेंजोदडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. ह्या शहरांचा शोध दयारामजी साहनी यांनी लावला.काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला.पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठिय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब,राजस्थान व कच्छ,
 गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार,बंगाल,ओडिशा पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेत महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती.आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापलेला होता.
संस्कृत,पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात ग्रिक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जण पदांमध्ये राजेशाही ही अस्तित्वात नव्हती,तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती.त्याकाळी अशी १६ जनपदे अस्तित्वात आलेली होती.गणराज्य असलेल्या जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तीची गणपरीषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारास संबंधीचे निर्णय घेत असत.अशा चर्चा ज्या ठिकाणी होत त्या सभागृहाला संतागार असे म्हटले जाई."गौतम बुद्ध" 
नेपाळमधील शाक्य गणराज्यातील राजपुत्र होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी प्रचलनात होते.जन पदांच्या संदर्भातला उल्लेख हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौध्द धर्मातील 'त्रिपिटक' आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदांचा व गणराज्यांचा उल्लेख आलेला आहे.
             कोसल महाजनपदाचाविस्तार हिमालयाच्या 
पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता.या राज्यातील श्रावस्ती कुशावती 
आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती.श्रावस्ती हे कौसल महाजनपदाची राजधानी होती.गौतम बुद्ध श्रावस्थीमध्ये 'चेतवणी' या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते.कोसल राजा प्रसेनजीत हा वर्धमान महाविर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता.कोसलचे राज्य मगधामध्ये विलीन झाले.
                  कोसलप्रमाणेच वत्स,अवंती आणि मगध हीदेखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती.मगधच्या उत्तरेस लिच्छविचे वृज्जी हे गणराज्य होते.वैशाली ही त्याची राजधानी होती.मगधचा राजा अजातशत्रूने लिच्छवी राज्य जिंकून ते मगधामध्ये
विलीन करून घेतले.वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळाचे 
कौशांबी होईल.हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार 
बांधले होते.राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता.राजा उदयन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही.ते अवंती महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे.या काळातील जनपदांच्या उदयातूनच सार्वभौम सत्ता ह्या आकाराला आल्या व त्याच्या प्रदेशांमध्ये 'क्या' सत्तांचा मोठा विस्तार घडून आला.अनेक वैभव संपन्न असे राज्य देशांमध्ये आकाराला आले.
            इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रिक 
सम्राट सिंकदर (अलेक्झांडर) च्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झाली.सिकंदराने गंगेच्या 
खोऱ्यापर्यंतचा भारताचा काही भाग जिंकून तेथे त्याचे ग्रीक क्षात्रप म्हणजे सुभेदार नेमले.भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रिसमध्ये त्याचा म्रुत्यू झाला.सिकंदराच्या म्रुत्युनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणार्या भारतीय प्रदेशात उठाव सुरु झाले.भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते.चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्यांच्या साथीने /मदतीने मगधच्या 
मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली.त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा 
पराभव केला. तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाचे कळस गाठला.भारताच्या पश्चिम सीमेपर्यत त्याचा विस्तार झाला.कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
             भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता.अशोकाच्यानंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरु झाले.शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहतदाता याची त्याचा सेनापती पुष्यमित्र शुग याने हत्या केली आणि शुग घराण्याची सत्ता स्थापन केली.पुढे काही काळानंतर शुग घराण्याचा मंत्री वासुदेव कण्व याने शुग घराण्याच्या राजाची हत्या केली आणि कण्व 
घराण्याची सत्ता स्थापन केली.मौर्य साम्राज्याच्या
पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले.सातवाहनांची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाले.हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच दीर्घकाल राहिलेला बौद्ध 
धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपांत पुनर्बांधणी झाली.
                 महाराष्ट्रातील प्रतिष्ठान (आजचे पैठण) ही त्यांची राजधानी होती. इ.स.९ व्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर-प्रतिहाररांची राजवट स्थापन झाली.कन्नोज ही त्यांची राजधानी होती.साहित्य,
गणित,शास्त्र,तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली.
             भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. तमिळनाडूतील पांड्य,चोल साम्राज्य,
चेरा,विजयनगरचे साम्राज्य / राज्य,महाराष्ट्रातील 
सातवाहन,यादव,विदर्भ या काळातील कला,स्थापत्य-
शास्त्रातील प्रगती आजही खुणावते.अजिंठा,वेरूळ,
हंपीचे प्राचीन नगर,दक्षिणेतील प्राचीन मंदिरे ही याच काळात बांधली गेली. चोल साम्राज्याचा विस्तार
आग्नेय आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता.चालुक्य,राष्ट्रकूट,परमारकाकतेय,होयसळ राज्ये उदयास आली.ग्रीकाप्रमाणेच शक,हूण,कुषाणांनीही 
भारतावर आक्रमणे केली.मध्य प्रदेशातील खजुराहो 
येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत.

👉स्त्रोत--> https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
📱मो.9503374833

Saturday, September 26, 2020

विषय-महाराष्ट्राचा भूगोल

 


🌏🏞️--विषय-महाराष्ट्राचा भूगोल--🌍🏔️

अभ्यासक मित्रांनो,M.P.S.C साठी जितके इतर विषय महत्त्वाचे आहेत,तितकाच भूगोल हा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे.महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने महाराष्ट्राचे प्रामुख्याने तीन भाग पडतात.1) कोकणची किनारपट्टी,(2) सह्याद्रीच्या रांगा,आणि (3) पूर्वेकडील पठारी प्रदेश.या भागांची माहिती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अभ्यासकांना/परीक्षार्थींना अत्यंत आवश्यक आहे.या सर्वांची आपण विस्तृत माहिती घेऊया..

🏝️(१) पश्चिमेकडील कोकणची किनारपट्टी :--> उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल खाडीपर्यंतच्या चिंचोळ्या व सपाट भूप्रदेशाला कोकण असे म्हणतात. कोकणपट्टीचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग केले जातात. या किनारपट्टीच्या पश्चिमेस अरबी समुद्र, तर पूर्वेस सह्याद्रीची रांग आहे. किनारपट्टीची एकूण दक्षिणोत्तर लांबी ७२० किमी. व रुं दी ४० ते ८० किमी. आहे. उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यात रुंदी सर्वात जास्त म्हणजे १०० किमी. पर्यंत आहे. दक्षिणेकडे मात्र रुं दी कमी होत जाते. सह्याद्रीच्या रांगेमुळे कोकणपट्टीची रुंदी मर्यादित झाली आहे. हा भाग सपाट नसून बराचसा उंचसखल व खडबडीत आहे. सह्याद्रीच्या तीव्र उतावरून द्रुतगतीने वाहत येणाऱ्या नद्यांनी किनारपट्टीवर खोल चर पाडलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर झीज झालेल्या उभ्या आडव्या डोंगररांगांनी हा प्रदेश व्यापलेला आहे.
             कोकणच्या किनारपट्टीची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत असून ती साधारणपणे १५ मी. पासून २७५ मी. पर्यंत आढळते. अगदी पश्चिमेकडील अरबी समुद्रलगतच्या सखल भागाची सस. पासून उंची फारच कमी असून या भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. तेथून पूर्वेकडील डोंगराळ भागाला ‘वलाटी’ असे म्हणतात. यानंतर सह्याद्रीच्या रांगेची सुरुवात होऊन त्याची उंची द्रुतगतीने वाढत जात असलेली दिसते. किनारपट्टीवर काही ठिकाणी कमी उंचीचे व जांभा खडकांचे पठारी भाग, तर नदीमुखांच्या प्रदेशात मैदाने आढळतात (किनारपट्टीचा, विशेषतः दक्षिणेकडील, भाग जांभ्या मृदेने व्यापला असून तेथे सस. पासून सरासरी७५ मी. उंचीचे पठारी भाग आढळतात). किनाऱ्यालगत मुरुड, जंजिरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांसारखे जलदुर्ग आहेत. कमी उंचीचे भाग नद्यांच्या गाळाने भरून आलेले आहेत. समुद्रकिनाऱ्यावर लहानमोठी बरीच बंदरे असून फार पूर्वीपासून व्यापाराच्या दृष्टीने ही बंदरे प्रसिद्ध आहेत. प्राचीन व मध्ययुगीन काळातही येथून अरबस्तान, ईजिप्त, ग्रीस, रोम यांच्याशी व्यापार चाले.

🏞️(२) सह्याद्रीच्या रांगा :--> महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील ही सह्याद्रीची रांग कोकणच्या किनारपट्टीला जवळजवळ समांतर अशी उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. तिला पश्चिम घाट असेही म्हणतात. राज्याच्या उत्तर सीमेपासून ते दक्षिणेस राज्याच्या सीमा ओलांडून कर्नाटक, केरळपर्यंत सह्याद्रीच्या रांगा पसरलेल्या आढळतात. सह्याद्रीमुळेच महाराष्ट्राचे कोकण व देश (पश्चिम महाराष्ट्र) हे दोन स्वाभाविक विभाग निर्माण झाले असून कोकण व पठारावरील नद्यांच्या हाच प्रमुख जलविभाजक आहे. पर्वताच्या उभय बाजूंना भूरचनेची दोन भिन्न स्वरूपे आहेत.पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असून तेथे लाव्हा खडकांच्या थरांचे काळे व उघडे कडे सर्वत्र दिसतात. अधूनमधून झीज होऊन निर्माण झालेले उघडे व वनाच्छादित असे पर्वतांचे अवशिष्ट उतारही पहावयास मिळतात. या पश्चिम उतारावर नद्यांनी खोल दऱ्यातयार केल्या आहेत. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याकडे कोकणची किनारपट्टीआहे. पर्वताचा पूर्व उतार मात्र बराच मंद असून तो पूर्वेकडील पठारात विलीन होतो.
              सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेकडे अनेक फाटे फुटलेले असून त्यांतील उत्तरेकडून दक्षिणेकडे अनुक्रमे सातमाळा,अजिंठा,डोंगररांगा,हरिश्चंदगड,
बालाघाट डोंगररांगा व महादेवाचे डोंगर प्रमुख आहेत. पठारावरील नद्यांचे हे दुय्यम जलविभाजक ठरतात. सह्याद्रीची उंची सामान्यपणे ९१५ ते १,२२० मी. असून उत्तरेकडे ती अधिक व दक्षिणेकडे कमी आढळते. सह्याद्रीत काही ठिकाणी सपाट माथ्याचे पठारासारखे भाग आढळतात, त्यांना घाटमाथा असे म्हणतात. कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट या प्रदेशात आहेत त्यांवरून याला घाटमाथा असे म्हटले जात असावे. भीमाशंकर, महाबळेश्वर, पाचगणी यांसारखी स्थळे अशाच भागावर आहेत. सह्याद्री व त्याच्या निरनिराळ्या डोंगररांगांच्या माथ्यावर ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे ठरलेले अनेक डोंगरी किल्ले आहेत. नासिक-अहमदनगर जिल्हांच्या सीमेवर असलेले कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर (उंची १,६४६ मी.) आहे. याशिवाय साल्हेर (१,५६७ मी.), महाबळेश्वर (१,४३८ मी.), सप्तशृंगी (१,४१६ मी.), त्र्यंबकेश्वर (१,३०४ मी.) ही सह्याद्रीतील इतर महत्त्वाची उंच ठिकाणे आहेत.सह्याद्री श्रेणी बरीचशी सलग असली,तरी तीमध्ये अधूनमधून खिंडी किंवा घाटही असलेले आढळतात. थळ, माळशेज, बोर, वरंधा, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा , आंबोली इ. घाटांनी देश व कोकण एकमेकांना जोडले आहेत. या दोन प्रदेशांतील वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने या घाटांना पूर्वीपासून महत्त्व आहे. मुंबई-नासिक महामार्गावरील कसारा येथील थळघाट व मुंबई-पुणे मार्गावरील लोणावळ्याजवळील बोरघाट यांद्वारे महाराष्ट्राचा पूर्व भाग मुंबईशी रस्ते व लोहमार्गाने जोडला गेला आहे.

⛰️(३) पूर्वेकडील पठारी प्रदेश :--> सह्याद्रीच्या पूर्वेस विस्तृत असा पठारी प्रदेश पसरलेला असून त्याला देश म्हणूनही ओळखले जाते. राज्याच्या जवळजवळ नऊ-दशांश भाग या पठाराखाली मोडतो. दख्खनच्या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्रात येत असून त्याला महाराष्ट्र पठार असेही संबोधले जाते. पश्चिमेस सह्याद्रीच्या पूर्व उतारापासून ते विदर्भाच्या अगदी पूर्व भागातील सूरजगड, भामरागड व चिरोली टेकड्यांपर्यंत सु. ७५० किमी. व उत्तरेकडील सातपुडा पर्वतापासून दक्षिणेस कोल्हापूर जिल्हापर्यंत सु. ७०० किमी. पर्यंत महाराष्ट्राचे पठार पसरले आहे. मुंबईसभोवतालच्या भागात या पठाराची जाडी अधिक आहे. पठाराची पश्चिम बाजू काहीशी उंचावलेली असून प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे व आग्नेयीस बंगालच्या उपसागराकडे असलेला दिसतो. पश्चिमेकडील सरासरी उंची ६०० मी. असून पूर्वेकडे वैनगंगा खोऱ्यात ती ३०० मी. पर्यंत कमी होत गेलेली आढळते.
              महाराष्ट्राच्या पठारावर ठिकठिकाणी भूमिस्वरूपांची स्थानिक वैशिष्ट्ये आढळतात. पठारावर सह्याद्रीच्या अनेक रांगा पसरलेल्या आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुक्रमे सातपुडा पर्वत, तापी−पूर्णेचे खोरे, सातमाळा−अजिंठा डोंगररांगा, गोदावरी खोरे, हरिश्चंद्रगड, बालाघाट डोंगररांगा, भीमा खोरे, महादेवाचे डोंगर व शेवटी दक्षिणेकडे कृष्णा नदीचे खोरे अशी या पठारी प्रदेशाची भूरचना आहे. पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरफाट्यांचे प्रारंभ सह्याद्रीत होत असून त्या पश्चिम वायव्येकडून पूर्व आग्नेयीकडे पसरलेल्या आहेत. यांचे उत्तर उतार तीव्र व दक्षिण उतार मंद आहेत. तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा या नदीखोऱ्यांनी ह्या डोंगररांगा एकमेकींपासून अलग केलेल्या आहेत. हा संपूर्ण प्रदेश लाव्हारसापासून तयारझालेल्या अग्निजन्य बेसाल्ट खडकांनी बनलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्हे याच पठारी प्रदेशात येतात. पठारावर सपाट माथ्याचे डोंगर व टेकड्या हे भूविशेष आढळतात. डोंगरांच्या मुख्य रांगांना किंवा अन्य भूमिस्वरूपांना त्या त्या भागात स्थानिक नामाभिधाने देण्यात आली आहेत.
                 महाराष्ट्राच्या उत्तर सरहद्दीवर सातपुडा पर्वतश्रेणी व तिच्या दक्षिणेस तापी−पूर्णा खोरे असून काही वेळा हा एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग मानला जातो.सातपुड्याच्या धुळे जिल्ह्यातील डोंगररांगांना तोरणमाळचे डोंगर असे संबोधले जात असून येथील तोरणमाळ शिखराची उंची १, ०३६ मी. आहे. तसेच अमरावती जिल्हातील डोंगररांगांना गाविलगड टेकड्या,मेळघाट डोंगररांगा असे म्हणतात. बैराट (१,१७७ मी.) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर तसेच चिखलदरा (१,११५ मी.) हे थंड हवेचे ठिकाण याच डोंगररांगांत आहे.
                     विदर्भाच्या पूर्वेकडील सीमाप्रदेशातील भूमिस्वरूपात विविधता आढळते. तेथे आर्द्र हवामानाच्या परिणामांमुळे झिजलेले ग्रॅनाइटी, चुनखडी व तत्सम खडक भूपृष्ठावर डोकावताना दिसतात व त्यामुळे अनियमित आकाराच्या सुळक्यांसारख्या टेकड्या निर्माण झाल्या आहेत. प्रसिद्ध रामटेक टेकडी (४०० मी.) हा या भागातील प्रातिनिधिक भूविशेष आहे. विदर्भात चिरोली, चिमूर, नवेगाव, भामरागड अशा लहानमोठ्या टेकड्या आढळतात.

🌊 नद्या :--> महाराष्ट्र राज्याच्या विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाल्या स्पष्टपणे दिसतात. कोकणातील नद्या व पठारावरील नद्या अशीही विभागणी करता येते. पश्चिमवाहिनी नद्या अरबी समुद्राला, तर पूर्ववाहिनी नद्या काहीशा पूर्वेस अगर आग्नेयीस वाहत जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर बंगालच्या उपसागराला मिळतात. बहुतेक नद्या सह्याद्रीच्या रांगेत ५०० ते ७०० मी. उंचीच्या भागात उगम पावत असून सह्याद्री हा राज्यातील प्रमुख जलविभाजक आहे. याशिवाय सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगररांगा व उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग यांमध्येही काही नद्या उगम पावत असून त्यांना दुय्यम जलविभाजक म्हणता येईल.
पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रात तापी ही सर्वांत लांब व प्रमुख नदी आहे.पूर्णा नदी  ही तापीची प्रमुख उपनदी असून तापी-पूर्णेचे खोरे प्रसिद्ध आहे. हे खोरे महाराष्ट्राच्या उत्तर भागात असून त्याने खानदेशाची भूमी सुपीक केली आहे. गिरणा व पांझरा नदीह्या तापीच्या इतर उपनद्या आहेत. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी २०८ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. ३१,३६० चौ. किमी. आहे. तापी-पूर्णा खोऱ्याचा दक्षिण भाग अधिक सपाट व सुपीक, तर उत्तर भाग वालुकामय व ओबडधोबड आहे
               तापी खोऱ्याच्या उत्तरेस नर्मदा नदीचे खोरे असून ती महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या उत्तर सीमेवरून सु. ५४ किमी. अंतर वाहते. नर्मदेचे फारच कमी जलवाहनक्षेत्र महाराष्ट्रात आहे. तापी व नर्मदा या दोन्ही नद्यांच्या मुखाचा प्रदेश गुजरात राज्यात असून उगम मध्य प्रदेश राज्यात आहे.
                कोकणातील पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्रीत उगम पावून १०० ते १५० किमी. पश्चिमेस प्रवास करून अरबी समुद्राला जाऊन मिळतात. कोकणची किनारपट्टी अरुं द असल्याने येथील बऱ्याच नद्यांची लांबी ८० किमी. पेक्षाही कमी आहे. दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, उल्हास, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इ. कोकणातील नद्या आहेत. वैतरणा व उल्हास नद्या तुलनेने अधिक लांब आहेत. बोरघाटात उगम पावणारी उल्हास नदी (लांबी १३० किमी.) साष्टी बेटाच्या थोड्या उत्तरेस वसईखाडीत अरबी समुद्राला मिळते. कोकणातील नद्यांच्या मुखांशी खाड्यांची निर्मिती झालेली आढळते. काहींच्या मुखांशी वाळूचे दांडे आढळतात. वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर, विजयदुर्ग, तेरेखोल या ठिकाणी अशा खाड्या आढळतात. कोकणातील नद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर उन्हाळ्यात त्या कोरड्या असतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या या नद्या विशेष उपयुक्त नाहीत. या नद्यांमुळे सह्याद्रीचा पश्चिम उतार विदीर्ण झाला आहे.
              पठारावरील पूर्ववाहिनी नद्यांमध्ये गोदावरी नदी,भीमा नदीव कृष्णा नदीह्या प्रमुख नद्या आहेत. यांना आर्थिक तसेच धार्मिक-सांस्कृतिक दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे.यांपैकी गोदावरी ही सर्वाधिक लांबीची नदी नासिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी ६६८ किमी. व जलवाहनक्षेत्र ७८,५६४ चौ. किमी. आहे. दारणा, प्रवरा, सिंदफणा, पूर्णा, प्राणहिता, ⇨मांजरा नदी, दुधना नदी व इंद्रावती ह्या गोदावरीच्या मुख्य उपनद्या आहेत. तापी व गोदावरी यांची खोरी सातमाळा−अजिंठा डोंगररांगांनी एकमेकींपासून अलग केलेली आहेत.
                 गोदावरीच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे असून ही दोन खोरी हरिश्चंद्रगड−बालाघाट डोंगररांगांनी एकमेकींपासून विभागली आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे भीमेचा उगम होतो. भीमा ही कृष्णेची उपनदी असली, तरी ती महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर कृष्णेला मिळते, त्यामुळे महाराष्ट्रात या नद्यांची वेगवेगळी खोरी आहेत. कर्नाटक-आंध्र प्रदेश यांच्या सीमेवर भीमा कृष्णेला मिळते. भीमेची महाराष्ट्रातील लांबी ४५१ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८४ चौ. किमी. आहे. कुकडी, घोड, भामा, पवना, इंद्रायणी, मुळा-मुठा, गुंजवणी, येळवंडी, नीरा नदी, कऱ्हा, सीना, माण ह्या भीमेच्या उपनद्या आहेत.
               भीमेच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे असून ही दोन्ही खोरी महादेव डोंगररांगांनी एकमेकींपासून वेगळी केली आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे कृष्णा नदी उगम पावते. महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या वेण्णा, कोयना तसेच वारणा, वेरळा, पंचगंगा ह्या कृष्णेच्या प्रमुख उपनद्या आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर ती कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. कृष्णेची राज्यातील लांबी २८२ किमी. व जलवाहनक्षेत्र २४,६८२ चौ. किमी. आहे.
            महाराष्ट्राच्या पूर्व भागातील−विदर्भातील
नद्या दक्षिणवाहिनी असून त्यांची एक स्वतंत्र नदीप्रणाली असलेली दिसते. वर्धा नदी व वैनगंगा नदी ह्या विदर्भातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. या दोन्ही नद्यांचा उगम महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेस मध्ये प्रदेश राज्यात आहे. वर्धा-वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे संबोधले जाते.वैनगंगा ही वर्धा नदीची पश्चिमेकडून येऊन मिळणारी प्रमुख उपनदी आहे. उंचसखल भूभागातून वहाणाऱ्या वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी ४५५ किमी. व जलवाहनक्षेत्र ४६,१८२ चौ. किमी. आहे तर वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी २९५ किमी. व जलवाहनक्षेत्र ३७,९८८ चौ. किमी. आहे.
            कोकण व पठारावरील नद्यांमध्ये भूरचनेच्या फरकामुळे काही वैशिष्ट्ये आढळतात. कोकणातील नद्या लांबीने कमी, शीघ्रवाही, अरूं द व खोल दऱ्यांतून वाहणाऱ्या, उथळ मुख्यप्रदेश असलेल्या तर पठारावरील नद्या त्यांच्या तुलनेने लांबीने अधिक, कमी वेगवान, रुंद व उथळ दऱ्यांतून वाहणाऱ्या आहेत. कोकणातील नद्यांचे बरेचसे पाणी वाया जाते तर पठारावरील नद्यांच्या पाण्याच्या बराचसा उपयोग जलसिंचन व जलविद्युत्निर्मितीसाठी करून घेतला जात आहे. मात्रदोन्ही प्रदेशातील नद्यांना नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात भरपूर पाणी असते.
              महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांत लहानमोठे नैसर्गिक वा कृत्रिम तलाव आढळतात. विशेषतः विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत तलावांची संख्या खूपच आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यातच सु.१५,००० तलाव आहेत.त्यामुळे विदर्भातील या भागाला तलावांचा प्रदेश असे म्हणतात.सह्याद्रीच्या उतारावर अनेक लहानमोठे गरम पाण्याचे झरे आहेत.उदा :- ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, राजापूर-खेडजवळील गंगा, रायगड जिल्ह्यातील पाली (उन्हेरे) इत्यादी.

🏞️ प्राकृतिक स्वरूपाचे सौंदर्य :--> ‘राकट, दगडांचा व कातळांचा देश’ अशी महाराष्ट्राविषयी जी रूढ समजूत आहे,ती तितकीशी योग्य वाटत नाही.बेसाल्टी महाराष्ट्र म्हणजे एक साच्याचा असला,तरी तो नीरस नाही. बेसाल्टी भूस्तरांवर विविध व आकर्षक भूमिस्वरूपे ठिकठिकाणी आढळतात.सह्याद्रीच्या मुख्य रांगांमध्ये सप्तशृंगी,‘ड्यूक्स नोज’, कळसूबाई असे उंच सुळके, किंवा सह्याद्रीच्या उतारावर असलेले वनाच्छादित लांबच लांब पट्टे,पायथ्याशी व दऱ्याखोऱ्यांमधील निबिड अरण्ये,अधूनमधून दिसणारे शीघ्र प्रवाहांचे पांढरे स्त्रोत व खळखळणारे धबधबे ही निसर्गाची देणगी, विशेषतः पावसाळ्यात व हिवाळ्यात, खुलून दिसते.या भागांतील लोणावळा, महाबळेश्वर, तसेच आंबा घाट आणि आंबोली घाट हे विविध जातींच्या वृक्ष-वनस्पतींनी समृद्ध आहेत.मध्य महाराष्ट्राच्या कोरड्या व निमकोरड्या डोंगराळ भागांतील बरीच वनसंपदा खालावली असली,तरी अजिंठा,महादेव, पुरंदर या रांगांच्या दऱ्याखोऱ्यांमधील वनश्री पावसाळ्यात रमणीय दिसते.सातपुड्यातील तोरणमाळ,मेळघाटमधील चिखलदारा, मराठवड्यातील म्हैसमाळ यांचे परिसरही प्रेक्षणीय आहेत.सहल,साहस व प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला,तर महाराष्ट्राची भूमी खूपच आकर्षक व अभ्यसनीय आहे, असे दिसून येईल.
              ग्रॅनाइटी व चुनखडकी भूस्तरांवरील पूर्व विदर्भातील डोंगराळ प्रदेशांमध्ये तर सृष्टिसौंदर्य जवळजवळ बाराही महिने पाहावयास मिळते. पण अद्याप त्याकडे आपले लक्ष आकृष्ट झालेले दिसत नाही. त्याप्रमाणेच दक्षिण सिंधदुर्ग जिल्ह्यातील सृष्टिसौंदर्य गोव्याप्रमाणेच रमणीय आहे.

लेखक--> चं.धु.देशपांडे
साभार/स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/40970/
संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

Friday, September 25, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-4-->

 इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-4-->


👉हत्यारे व आयुधे:--> आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ

 दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-

योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा.,  पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले.  त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी  उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.

👉अग्नी :--> तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत. 

👉उपकरणे,भांडे  :--> पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.

नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही.तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व भाजून काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुग  यांच्या संधिकालातीलच आहे.

                बांबू,लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते. 

स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

Wednesday, September 23, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-3

 इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-3


👉वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये बुर्झाहोम  येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी  निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.

 जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको  (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय.एरवी गृह-रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये फायूम  येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी.मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

Tuesday, September 22, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ--> भाग-2

 इतिहास : अश्मयुगीन काळ --> भाग-2


मानवी जीवन-->

 अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.

आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.

याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.

 शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.

अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.

शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.

समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.

आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी. 

  गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.

उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.

एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.

नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.

दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत  वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.

  शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.

👉 स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

इतिहास : अश्मयुगीन काळ

 इतिहास : अश्मयुगीन काळ (भाग-1)-->


अश्मयुग : मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागैतिहास  म्हणतात.प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले  जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.


अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.


अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत. 


अश्मयुगीन कालखंड


 पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले. 


मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.


उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.


आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्‍नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.


नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर,  मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन  हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३००० च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.


👉 स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/


संकलन--> निलेश पाटील 

(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)

मो.9503374833


बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...