स्पर्धा परीक्षासंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या 'परीक्षा विश्व' ब्लॉगला भेट द्या

Wednesday, September 23, 2020

इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-3

 इतिहास : अश्मयुगीन काळ,भाग-3


👉वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये बुर्झाहोम  येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी  निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.

 जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको  (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय.एरवी गृह-रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.

यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये फायूम  येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.

आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्‍याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.

दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी.मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.

स्त्रोत--> https://vishwakosh.marathi.gov.in/26529/

संकलन--> निलेश पाटील
(मुख्य संपादक/अॅडमिन,परीक्षा विश्व)
मो.9503374833

No comments:

Post a Comment

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड.

 ✍️ बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिस्वा सरमा यांची बीडब्ल्यूएफ परिषदेसाठी निवड. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (बीएआय...